मुंबई : अजित पवारांनी शरद पवारांशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. 'जे पेरलं तेच उगवलं, स्वत: शरद पवारांनी वसंतरावांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होत आहे', अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर 'एबीपी माझा'शी बोलताना शालिनी पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


1978 साली शरद पवारांनी हेच केलं होतं. ज्यावेळी वसंत पाटील मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या कानावर आमदारांबाबत शंका आली. त्यावेळी शरद पवारांनी वसंत पाटील यांना भेटून सांगितले की, शंका घेऊ नका. परंतु प्रत्यक्षात जेव्हा सभागृह सुरु झाले, त्यावेळी मात्र शरद पवार हे 18-19 लोकांना घेऊन विरोधी पक्षातल्या नेत्यांबरोबर जाऊन बसले. तेव्हा वसंत पाटलांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. समोरासमोर बोलून केलं असतं तर चाललं असतं, पण शरद पवार मराठ्यांसारखे लढले नाहीत. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला. त्याच पद्धतीने निसर्गाने त्यांना उत्तर दिलं. पुतण्याने त्यांच्यासोबत जाऊन हातमिळवणी केली, असेही त्या म्हणाल्या.

शिखर घोटाळ्यावर बोलताना शालिनी पाटील म्हणाल्या, या भ्रष्टाचारात अजितदादा जेवढे जबाबदार तेवढेच शरद पवारही जबाबदार आहेत. शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवारांसह साठ लोक जबाबदार आहेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघड होत आहे. या भ्रष्टाचाराला पांघरूण घालता येतं का? संरक्षण मिळवता येतं का? हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे. परंतु सत्तेचं पांघरुण हे काही दिवसासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. हा एवढा मोठा भ्रष्टाचार पाठीशी घालायला देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती तयार होणार नाहीत.

शरद पवारांनी दोस्ती केलेली चालते अजित पवारांनी केलेली दोस्ती तुम्हाला नाही चालत का? असा प्रश्नदेखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. अजित पवारांना घेऊन जर सत्तास्थापन करत असतील तर मी थेट पंतप्रधान मोदी यांना याबाबत पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार आहे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदासारखं एवढं मोठं पद मिळाव असं मला वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.