नागपूर : आरटीओ कार्यालयांमध्ये कसा भ्रष्टाचार होतो आणि वाहनांना परवाने कसे दिले जातात. त्यासाठी तुम्ही डीलर्स लोक काय काय करता, याची सर्व माहिती मला आहे. आरटीओ कार्यालयामधील हे भ्रष्ट कारभार थांबविण्याचे माझं उद्दिष्ट आहे. मात्र, भ्रष्ट आरटीओ अधिकारी काही खासदारांकडून लॉबिंग करून तसं होऊ देत नाहीत, असा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.


गडकरी नागपुरात ऑटो डीलर्स संघटना फाडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल्स डीलर्स एसोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


कोणतीही शहानिशा न करता बोगस वाहन परवान्यांमुळे देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. यामध्ये जवळपास दीड लाख वाहनचालकांचा मृत्यू होत असल्याची माहिती गडकरींनी दिली. आरटीओ कार्यालय आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी मोटार वाहन कायद्यात केंद्र सरकारने काही बदल प्रस्तावित केले आहे. याबाबतचं विधेयक लोकसभेतून मंजूर झालं असून येत्या अधिवेशनात ते राज्यसभेत मंजूर होईल, असा विश्वास ही गडकरी यांनी व्यक्त केला.


सध्या सरकार मिथेनॉलला डिझेलचा पर्याय बनवून मोठ्या वाहनांचा परिचालन मिथेनॉलवर करण्याच्या योजनेवर काम करत आहे. लवकरच मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि गुवाहाटी येथे 10 बसेस पूर्णपणे मिथेनॉलवर चालविल्या जाणार, अशी माहिती गडकरी यांनी दिली.


फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल्स डीलर्स असोसिएशच्या या बैठकीत फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून नागपुरच्या आशिष काळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत आशिष काळे यांच्या नेतृत्वात ऑटोमोबाइल्स क्षेत्रासमोर भविष्यात येणाऱ्या आव्हानांबद्दल मंथन करण्यात आले.