मुंबई : काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना बाधितांचा आकडा काहीसा वाढतोय. राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्या त्यांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असंही ते म्हणाले.


"स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्या त्यांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्या ठिकाणी या सर्व उपाययोजना केल्या जातील. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. कोरोना परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवू आहे. जशी गरज पडेल तशी काळजी घेण्यात येईल.", असं राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर बोलताना सांगितलं.


आरोग्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, "कोरोना बाधितांची फार मोठी संख्या वाढली आहे, असं काही नाही. संख्या थोडीफार वाढते, पुन्हा थोडीफआर कमी होते. त्यामुळे अडीच-तीन हजारांच्या दरम्यान दररोजची संख्या वाढण्यामागचं प्रमाण मागील दोन-तीन महिन्यांपासून आहे. मला असं वाटतं की, हा कर्व्ह फ्लॅट झालेला आहे. किरकोळ स्वरुपात वाढलाय. पण काळजी घेणं गरजेचं आहे."


राजेश टोपे म्हणाले की, "मुंबई लोकलमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, असं काही नाही. मुंबईच्या आयुक्तांनीदेखील यासंदर्भात माहिती दिली आहे. पण आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागेल."


महत्त्वाच्या इतर बातम्या :