पुणे : पेट्रोलिंग करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरड कोसळल्याचा संदेश वेळीच दिल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सह्याद्री एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला असता. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर ही घटना गुरुवारच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.


ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यानच्या बोरघाटात रेल्वे मार्गावर भले मोठे दगड कोसळलेले होते. डाऊन मेन आणि डाऊन मिडल लाईनवरील दरड पाहून पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं हा संदेश पोहचवला. तो संदेश मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसच्या चालकापर्यंत पोहोचला.

यावेळी रेल्वेने ठाकुरवाडीचे स्टेशन पार केले होते. संदेश मिळाला त्यावेळी दरड कोसळलेल्या ठिकाणापासून अगदी दोन किलोमीटरवर अंतरावर ही रेल्वे पोहचली होती. चालकाने प्रसंगावधान दाखवत दरड कोसळलेल्या स्थानापासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रोखली अन शेकडो प्रवाशांचा जीव वाचला.

यानंतर तातडीनं दरड हटवण्यात यंत्रणा गुंतली. डाऊन मिडल लाईनवर कमी प्रमाणात दरड होती. ती हटवून मार्ग खुला करण्यात दोन तास उलटले. दरम्यान उलट्या दिशेने ठाकूरवाडी रेल्वे स्थानकावर सह्याद्री एक्सप्रेस आणली गेली. मिडल लाईनवरील वाहतूक खुली होताच साडे दहाच्या सुमारास सह्याद्री एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.

आता डाऊन मेन लाईन वरील भली मोठी दगडं हटवण्यात यंत्रणा गुंतली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दरड कोसळल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील चार महिने या मार्गावरून त्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.