मुंबई : राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.


राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा 1 लाखाचा टप्पाही गाठला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 2 लाखांवर पोहचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये 3, 4 आणि 5 लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही 7,8,9 आणि आज 10 लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला.


असा पार झाला बऱ्या झालेल्या 10 लाख रुग्णसंख्येचा टप्पा


2 जुलै- 1 लाखाचा टप्पा - (1 लाख 1 हजार 172 रुग्ण बरे झाले)
25 जुलै- 2 लाखांचा टप्पा - (2 लाख 7 हजार 194 रुग्ण बरे झाले)
5 ऑगस्ट- 3 लाखांचा टप्पा (3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे झाले)
14 ऑगस्ट- 4 लाखांचा टप्पा (4 लाख 1 हजार 442 रुग्ण बरे झाले)
24 ऑगस्ट- 5 लाखांचा टप्पा (5 लाख 2 हजार 490 रुग्ण बरे झाले)
3 सप्टेंबर- 6 लाखांचा टप्पा ( 6 लाख 12 हजार 484 रुग्ण बरे झाले)
10 सप्टेंबर- 7 लाखांचा टप्पा ( 7 लाख 715 रुग्ण बरे झाले)
17 सप्टेंबर- 8 लाखांचा टप्पा ( 8 लाख 12 हजार 354 रुग्ण बरे झाले)
21 सप्टेंबर- 9 लाखांचा टप्पा (9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे झाले )
26 सप्टेंबर- 10 लाखांचा टप्पा (10 लाख 16 हजार 450 रुग्ण बरे झाले)