सोलापूर : करमाळा तालुक्यातील आप्पा वायसे हे अतिशय धार्मिक कुटुंब. रोज चोवीस तास कुटुंबावर कृपा करणाऱ्या भक्तिभावाने परमेश्वरासमोर चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याची श्रद्धा आहे. मात्र याच दिव्याने आज त्यांचा घात झाला आणि भर दुपारी संपूर्ण घरसंसाराची होळी झाली. दुपारी घरातील मंडळी शेतात काम करून घरात परत आली असताना एका कोपऱ्यात घर पेटले. घरात आप्पा वायसे त्यांची पत्नी, वडील आणि दोन मुले होती. शेजारी ओरडत आल्यावर यांना आग लागल्याचे समजले आणि सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. आज सोमवार असल्याने वायसे पती पत्नीचा उपवास होता. सकाळी पूजा केल्यावर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळविली आणि घराला आग लागली .


आग लागल्यानंतर मौल्यवान सामान बाहेर काढायची धडपड सुरु असतानाच आग भडकली आणि आहे असे बाहेर पळावे लागले. लगेच परिसरातील नागरिक आग विझवण्यासाठी धावले. मात्र सुटलेल्या वाऱ्यामुळे आग भडकतंच गेली . यामुळे आप्पा वायसे यांच्या घरासोबत शेजारी असलेल्या त्यांच्या भावाच्या घरालाही आग लागली आणि पाहता पाहता ही आग समोरच्या दोन एकर उसालाही लागली आणि दोन लाखाचा ऊसही भस्मसात केला.


अप्पा यांचा थोरला मुलगा मयूर हा Bsc chemistry चे शिक्षण घेऊन MPSC करीत होता. तर धाकटा मुलगा महेश याने नुकतीच झेरॉक्स कागदपत्रावर Msc biotechnology साठी प्रवेश घेतला होता . या दोघांच्या महत्वाच्या कागदपत्रासह जमीन व इतर महत्वाची कागदपत्रेही यामध्ये जळून गेली आहेत. दुर्दैवाने एवढ्या थंडीत आज या कुटुंबाला निवारा घ्यायलाही जागा उरलेली नाही. जळालेल्या घराकडे बघत बसलेल्या कुटुंबाला आता शेजारी वस्तीवर आसरा घ्यावा लागणार आहे . वायसे यांचे 6 लाखाचे नुकसान झाले आहे. यात दोन दिवसापूर्वी विकलेल्या उडीदाचे अडीच लाख रुपयेही जाळून गेले. याशिवाय या आगीत तोडणीला आलेला दोन लाखाचा ऊस जळून गेला आहे . देवावर श्रद्धा ठेवून जगणाऱ्या वायसे कुटुंबाचे घर मात्र त्याच घराच्या देवघरात असलेल्या दिव्याने जळाले हे धक्कादायक वास्तव वायसे कुटुंबही आता नाकारु शकत नाही.