कल्याण : ठाण्यात हत्या झालेल्या नागपूरच्या तरुणीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीवर तिच्याच बालमित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानेच तिची हत्या केल्याची माहिती आहे.


आरोपी अक्षय वालोदे आणि निकलेश पाटील यांनी आपल्याच बालमैत्रिणीची हत्या केली. दोघांनाही अंबरनाथला आणणार असून पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

नागपूरला राहणाऱ्या तरुणीची ठाण्यात हत्या केल्यानंतर मृतदेह बेळगावात आढळला होता, तर आरोपींना रत्नागिरीत अटक झाली, असं काहीसं गुंतागुंतीचं प्रकरण उघड झालं होतं.

नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या, मृतदेह बेळगावात, आरोपींना रत्नागिरीत अटक


ठाण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची तिच्याच बालमित्रांनी हत्या केली. तरुणीच्या दोन बालमित्रांनी तिला 4 सप्टेंबरला अंबरनाथमध्ये पार्टीसाठी बोलवलं होतं. यावेळी तिच्यावर गँगरेप करण्यात आला.  तिने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याने तिला मारुन टाकण्यात आलं. ही तरुणी मूळची नागपूरची होती.

हत्येनंतर आरोपींनी तिसऱ्या एका मित्राला पार्टीसाठी म्हणून बोलवून घेतलं. फिरायला जाऊया, असं सांगत त्याच्या नकळत तरुणीचा मृतदेह घेऊन ते कर्नाटकातील बेळगावकडे गेले. त्यांनी निपाणीजवळ तो मृतदेह फेकून दिला.

मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तिसऱ्या मित्राला याची कुणकुण लागली. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. रत्नागिरीमार्गे ठाण्याला येत असताना, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

संबंधित तरुणीने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. अवघ्या 20 ते 25 दिवसांपूर्वी ती नोकरीनिमित्त ठाण्यात आली होती. ती एका खासगी वसतिगृहात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही केल्या संपर्क होत नव्हता. मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांना फोन करुन तिची हत्या झाल्याचं सांगितलं.