मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोना काळात रद्द झालेल्या दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना अंशत: परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लाखो विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 415 रुपये जमा करून फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांना 59 तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 94 रुपये परतावा मिळणार आहे. यावर पालक संघटनांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी बोर्डाने सुद्धा सर्व खर्च समोर ठेवला आहे. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पहाता एप्रिल मे महिन्यात नियोजित दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या. बोर्डाच्या परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असताना अगदी परीक्षा तोंडावर आल्या नंतर अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले परीक्षा शुल्क हे मंडळाकडे जमा होते. त्यामुळे हे परीक्षा शुल्क लवकरात लवकर विद्यार्थ्यांना परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. त्यानंतर गुरुवारी परीक्षा शुल्काचा अंशतः परतावा देणार असल्याचा परिपत्रक बोर्डाने काढले.  त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना 59 रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 94 रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे


मात्र हा परतावा अगदी पन्नास, शंभर रुपये असल्याचं बघून पालकांनी मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय, प्रत्येकी 415 रुपये परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊन परतावा इतका कमी का असा प्रश्न सुद्धा विचारला. त्यावर बोर्डाने सुद्धा झालेल्या खर्चाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे


बोर्डाने सांगितलेला खर्च कसा झाला? 



  • दहावी बोर्ड परीक्षेला 16 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी, बारावी बोर्ड परीक्षेला 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 415 रुपये परीक्षा शुल्क भरले होते.

  • यामध्ये बोर्डाच्या म्हणण्यानुसार, बोर्ड परीक्षा रद्द झाली तरी परीक्षेची तयारी पूर्ण झाली होती. 

  • प्रश्नपत्रिका संपादन छपाई, उत्तरपत्रिका छपाई, इतर तयारी करणे व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका विभागीय मंडळात पोहचविण्यासाठी 321 रुपये प्रत्येकी खर्च झाले. 

  • परीक्षा रद्दच झाल्याने उर्वरित परीक्षकांचा पेपर तपासण्यासाठीचे मानधन दिले नाही, ते उरलेले 94 रुपये परतावा म्हणून देण्यात येत आहे. 

  • तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातून अकरावी सीईटीसाठी उभारण्यात आलेल्या ऑनलाईन यंत्रणेचा खर्च वजा करण्यात येणार असल्याने त्यांना 59 रुपयांचा शुल्क परतवा मिळणार आहे.


विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी
त्यामुळे पालकांची या शुल्काबाबतची नाराजी आणि त्यातून पूर्ण शुल्क मिळावे यासाठी होणारी मागणी पाहता शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जरी त्या वेळची कोरोना परिस्थिती पाहून घेतला होता तरी त्याचा भुर्दंड मात्र आता विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागत आहे. जमा झालेल्या पैशांमध्ये जेव्हा झाले त्यातून पूर्ण पैसे द्यावेत, शिवाय या सगळ्या खर्चाची चौकशी व्हावी आणि व्यवहार समोर आणावा अशी मागणी पालक संघटानांकडून करण्यात आली आहे. 


त्यामुळे बोर्ड परीक्षा रद्द झाल्यानंतर 400 रुपये विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून फक्त 50, 100 रुपये जर परतावा मिळतोय. त्यामुळे बोर्डाने जरी हा सगळा खर्च समोर ठेवला असला त्यामागचं कारण सांगितले असले तरी पालकांची नाराजी स्वाभाविक आहे. पण याला कोरोना परिस्थिती जबाबदार होती हे जरी मान्य केले तरी भविष्यात अशाप्रकारे निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी नक्की घेतली जाईल ही अपेक्षा आहे.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha