नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या नागपूर तरुण भारत या वृत्तपत्राने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार टीका केली आहे. आज प्रकाशित झालेल्या अग्रलेखात शिवसेनेमध्ये अर्धनारी नटेश्वराचा प्रयोग सुरु असल्याची टीका करण्यात आली आहे.


मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना चीनचा हुकूमशाह अशी बिरुदावली लावल्यानं उद्धव ठाकरेंवर ही टीका करण्यात आली आहे.

एक नजर 'तरुण भारत'च्या अग्रलेखावर:

उसने अवसान!

* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे, त्यांच्या भाषेत म्हणे ठणकावणारे भाषण शिवसेनेच्या मेळाव्यात झाले! शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. शिवसेनाप्रमुखांचा वारंवार उल्लेख करावा लागतो, यातच सर्वकाही आले! ‘‘हिंमत असेल तर दोन हात करायला समोर या,’’ असे एक अजब आव्हान त्यांनी भारतीय जनता पक्ष, या आपल्या युतीतील सहकारी पक्षाला दिले आहे. हे आव्हान पहिल्यांदा नाही. वारंवार दिले गेले आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत असेच आव्हान दिले गेले होते. अगदी उपकार केल्यासारखे मित्रपक्षांसह भारतीय जनता पक्षाला *   * १२० जागांपेक्षा जास्त जागा सोडायला शिवसेना तयार नव्हती. ‘हिंमत असेल तर मैदानात या,’ असे सांगतच भाजपाशी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राजकारणात नुकताच प्रवेश केलेला युवा नेता आदित्य ठाकरे यांना पाठवून भाजपाची किंमत आणि हिंमत शिवसेनेच्या लेखी किती आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला होता.

* शिवसेनापक्षप्रमुखांनी तर नरेंद्र मोदी यांना थेट अफजल खानाची उपमा देऊन तोंडसुख घेतले! वास्तविक, मित्र म्हणून मिठी मारायची, बगलेत मान पकडून वरून कट्यार चालवायची, याला अफजल खान म्हणत असतात. असे करताना कोथळाही वाचवावा लागतो. फक्त ‘दगा… दगा…’ म्हणणेच हातात राहते! भाजपा-सेनेत परस्परांत हे काहीही असले आणि कुणी कसलाही आव आणत असले, तरी लोकशाहीत मतदारच कुणाची किती हिंमत आणि किती किंमत, याचा निर्णय करत असतात.

* ‘‘शिवसेनेला जर भारतीय जनता पक्षाच्या सरकारची भूमिका इतकी पटत नसेल, तर त्यांनी केवळ शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडले पाहिजे.’’ मात्र, सत्तेच्या चुंबकापासून दूर झाले तरी किंवा सत्तेत असल्यामुळे मवाळ भूमिका घेतली तरी पक्षसंघटनेतील ‘शिवबंधन’ही ढिले होईल, अशी भीती वाटत असल्याने, सत्ताही सोडायची नाही आणि आपले वेगळे अस्तित्व ठेवण्यासाठी सतत टीकेचा सूरही चालू ठेवायचा, असा हा ‘अर्धनारीनटेश्‍वरा’चा प्रयोग चालला आहे!

* भारतीय जनतेला राजकीय अस्थिरता बिलकूल आवडत नाही. सत्तेत सहभागी असलेला एक पक्ष जर राजकीय अस्थिरतेचे डोहाळे लागल्यासारखे वागत असेल, तर जनतेला ते पसंत नसते. जनतेने हे अनेकदा दाखवून दिले आहे. आताही शिवसेनापक्षप्रमुख विनाकारण उसने अवसान आणून आक्रमकतेचा आभास निर्माण करत असतील, तर त्यांना मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनता मतदानातून आपली नापसंती व्यक्त करण्याचीच जास्त शक्यता आहे. त्याच त्या चुका वारंवार करत मतदारांना मूर्ख समजण्याचा खेळ त्यांनी न खेळलेला बरा…!