Ujani Dam Boat Accident News : उजनी बोट दुर्घटनेला (Ujani Dam Boat Accident) जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग जबाबदार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तुषार झेंडे पाटील (Tushar Zende Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 


पत्रात नेमकं काय म्हटलंय?


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरणाच्या पात्रामध्ये दिनांक 21 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी असा उजनी जलाशय पात्रामध्ये प्रवास करत असताना प्रवासी बोट वादळी वाऱ्यामुळे उलटली. या बोटीतील सर्व सात प्रवासी बुडाले फक्त एका प्रवाश्याने पोहून स्वतःचा जीव वाचवला. त्यांनतर या गंभीर घटनेची सर्वांना माहिती दिली. त्यांनतर महसूल, पोलीस, प्रशासन NDRF यांचे मदतीने बचाव कार्य सुरु होते. आज सकाळी 23 मे 2024 रोजी बुडालेल्या सर्वांचे मृतदेह मिळून आले आहेत. मृतांमध्ये गोकुळ दत्तात्रय जाधव, कोमल गोकुळ जाधव, माही गोकुळ जाधव, शुभम गोकुळ जाधव रा. झरे ता. करमाळा तसेच अनुराग अवघडे व गौरव धनंजय डोंगरे रा. कुगाव या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेस केवळ जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी सोलापूरपुणे (महसूल) प्रशासन जबाबदार असल्याचे तुषार झेंडे पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.


बोटीमध्ये लाईफ जॅकेट असते तर सहा लोकांचा जीव वाचला असता


उजनी जलाशयामध्ये कोणालाच बोटिंग किंवा नौकाविहार करण्याची परवानगी नाही. तरीदेखील गेली अनेक वर्षापासून सदर ठिकाणी प्रवाशी बोट चालवली जाते. ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामध्ये कोणत्याच सुरक्षिततेच्या उपाययोजना नाहीत. इतर ठिकाणाहून भंगारात खरेदी केलेल्या बोटी या ठिकाणी वापरल्या जातात. एकाही बोटीमध्ये लाईफ जॅकेट नाही. सदरच्या प्रवासी बोटीमध्ये लाईफ जॅकेट असते तर सहा लोकांचा जीव वाचला असता असे झेंडे पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. सन 2017 मध्ये देखील अशीच बोट उलटून 6 डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला होता. केवळ दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळं सदरची घटना घडली आहे. केवळ गौण खनिजासाठीच प्रशासन हक्क दाखवते का ? कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन यांचेवर सदरच्या बेजबाबदारपणा बाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. उजनी जलाशयामध्ये सर्व अनधिकृत बोटिंग, नौकाविहार तत्काळ बंद करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं झेंडे पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. 
        
सदरची दुर्दैवी घटना जलसंपदा विभागाच्या उजनी धरणाच्या जलाशयात प्रशासनाच्या दुर्लक्षाने घडली आहे. त्यामुळं शासनाच्या वतीने गरीब कुटुंबियांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची विनंती तुषार झेंडे पाटील यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या:
 


आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरला, बेकायदा जलवाहतूक बंद करण्याची मागणी