सांगली : नरभक्षक टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर आता राजकारण तापायला लागलं आहे. वन विभागाने बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीचा बळी घेतल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.


वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं असून याचा आम्ही निषेध करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.

वन विभागाला ही हिंसक वाघीण दिसली मात्र वनक्षेत्रात लाकूड आणि प्राण्यांचे अवशेष चोरले जात आहेत याकडे मात्र या खात्याचे लक्ष नाही. वन विभागाने फक्त उद्योगपतींसाठी अवनी या वाघिणीचा बळी घेतला असून याचा जाब आम्ही वन्य अधिकारी आणि वन मंत्र्यांना विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.