मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात तब्बल दहा जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. 2017 मध्ये आतापर्यंत म्हणजेच सुरुवातीच्या साडेचार महिन्यात स्वाईन फ्लूनं मृत्यू होणाऱ्यांची संख्या 181 वर पोहचली आहे.


एप्रिल महिन्यापर्यंत 933 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांपैकी 563 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर 132 जणांवर अजूनही पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे.

सध्याचं वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीस पोषक असल्यामुळे या आजाराने डोकं वर काढलं आहे. मात्र स्वाईन फ्लू आजाराला घाबरुन जाण्याची गरज नसून ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं दिसल्यास घरगुती उपचार न करता त्वरित दवाखान्यात जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.