कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची कुजबूज सुरु आहे.


गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्याचाच फायदा घेत भाजपनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवण्यासाठी सदाभाऊ खोत यांना अधिकची मंत्रिपदं देऊ केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांनीही भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातमीला थेट नकार दिला नाही. पण भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

दरम्यान आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसारच काम करायचे आहे असंही खोत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास तयार असल्याचं मतही त्यांनी नोंदवलं.

दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मात्र अशा कोणत्याही फुटीचा इन्कार केला आहे. भाजपमध्ये सक्षम मंत्र्यांची वानवा असल्यानेच सदाभाऊंना वाढीव मंत्रिपदं मिळाल्याचा दावा शेट्टी यांनी केला.

जुलै 2016 मध्ये झालेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सदाभाऊ खोत यांनी पणन राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.