पुणे :  लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत असलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी असून भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली. त्यात 49 जागा लढवण्याबाबत ठराव देखील पारित केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या.

49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी आहे. मात्र मी विधानसभा लढवणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. या सरकारने शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दुष्काळ हा निकष धरून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

20 जुलैच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे. ज्या जिल्ह्यात पीक कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतील. त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. राज्य सरकारने दुधाच्या प्लास्टिक पिशवी बंदीबाबत फेरविचार करावा असे ठराव कार्यकारिणीत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले मात्र या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामना सहन करावा लागला होता.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडूनच काँग्रेसला 40 जागा देण्याची ऑफर काल देण्यात आली आहे.