अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज अकोल्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि कवि डॉ. विठ्ठल वाघ यांची भेट घेतली. अकोल्यातील सुधीर कॉलनीतील डॉ. वाघ यांच्या 'गुलबास' या निवासस्थानी आज सकाळी ही भेट झाली. या भेटीवेळी राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर, स्वाभिमानीचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाधक्ष अमोल हिप्परगे, अकोल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. गजानन नारे उपस्थित होते.


यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांचा कविता, साहित्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार केला. राजू शेट्टी आणि डॉ. विठ्ठल वाघांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी चळवळीची पुढची दिशा आणि आंदोलनं यावर सखोल चर्चा झाली. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या कथा, कविता आणि कादंबऱ्यांमधून शेतकऱ्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा सातत्याने मांडण्यात आल्या आहेत. 'वृषभसूक्त', 'काया मातीत तिफन चालते', 'कपाशीची चंद्रफूले', 'साय', 'पिप्पय' या कवितासंग्रहातून डॉ. वाघांनी शेतकऱ्यांची दु:ख साहित्याच्या व्यासपीठावर. मांडलीत.

या चर्चेदरम्यान डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या अनेक कवितांमधून शेतकऱ्यांची सध्यस्थिती मांडली. आपली 'काळ्या मातीत मातीत तिफन चालते' ही लोकप्रिय कविताही त्यांनी यावेळी सादर केली. कापसाच्या प्रश्नाची दाहकता मांडणाऱ्या आपल्या काही रचना त्यांनी यावेळी सादर केल्यात.
'कापसाच्या गावातून जाग आली नागव्यांना
उजेडाचे दान आता सुर्य मागे काजव्यांना'.
या कविता ऐकून राजू शेट्टी अतिशय भावूक झाल्याचं यावेळी पहायला मिळालं. भेटीच्या शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित काम करण्यावर दोघांचंही एकमत झालं.

कवी विठ्ठल वाघ यांची रचना -
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो... नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती... माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं... भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते... वाट राघूची पाहते
राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
सर्जा रं माझ्या ढवळया रं माझ्या पवळ्या रं माझ्या अहा...
झोळी झाडाला टांगून राबराबते माउली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

संबंधित बातमी - शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नसताना 'करून दाखवले' असे होर्डिंग कशाला; राजू शेट्टींचा सवाल

Kolhapur Protest | कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात मोर्चा, कामगार संघटनांच्या भारत बंदचा कोल्हापुरात परिणाम | ABP Majha