नवी दिल्ली : जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. याआधीही जैन यांनी जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळले होते.


 

सुरेश जैन यांना घरकुल घोटाळ्याप्रकरणी 11 मार्च 2012 रोजी अटक झाली होती. यानंतर सुरेश जैन यांनी जामीन मिळवण्यासाठी पाच वेळेस अर्ज केला आहे. मात्र, पाचही वेळा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

 

जळगाव घरकुल घोटाळा काय आहे?

 

जळगाव नगरपरिषदेने 1996 साली स्वस्तात घरे देण्याची योजना आखली होती. गुलाबराव देवकर तत्कालीन नगराध्यक्ष होते. नगरपालिकेच्या ताब्यात जागा नसतानाही घरकुलांचे बांधकामाला सुरुवात करण्यात आले. खान्देश बिल्डरला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, योजना अर्ध्यावरच रखडली.

 

तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या फिर्यादीवरून 3 फेब्रुवारी 2006 रोजी 29 कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी मंत्री आमदार सुरेश जैन यांच्यासह माजी महापौर, नगरसेवक प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर आणि नाना वाणी हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी अटकेत आहेत.