पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत, यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत एनडीएतील मंत्रिपदाच्या सर्व शक्यतांना खासदार सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम दिला आहे. तसंच राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभारावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.


दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी एमडीएतील सहभागाच्या वृत्ताचं खंडन केलं. गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यात सत्तेत असलेलं फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. सरकारमधील तीन मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मुख्यमंत्री सतत मी अभ्यास करतोय म्हणतात, मात्र गेली तीन वर्ष ते एकाच वर्गाचा अभ्यास करत असतील, तर त्यांना आणखी मदतीची गरज असल्याचा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

राणेंवरही निशाणा

एखाद्या पक्षातून कुणी निघून गेल्यास किंवा पक्षात दाखल झाल्यास कोणताही फरक पडत नाही. मुलंही आईच्या जाण्यानंतर जगतातच, असं म्हणत वारंवार पक्ष बदलणाऱ्या राणेंवर सुप्रिया सुळेंनी नाव न घेता टीका केली आहे. कोणताही पक्ष तत्त्व आणि विचारानेच टिकते. संधीसाधू नेते राजकारणात टिकाव धरु शकत नसल्याचा इतिहास असल्याचंही सुळेंनी यावेळी सांगितलं.

देशात मोदींच्या विरोधात फळी

दरम्यान रविवारी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या 'भाजप हटाओ, देश बचाओ' रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर देशात मोदी सरकारविरोधी फळी तयार होत असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

राम रहीम प्रकरणी सरकार दोषी

हरियाणातील बाबा राम रहीम प्रकरणात सर्व दोष तिथल्या सरकारचा आहे. मी जर त्या राज्याची मुख्यमंत्री असते तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र हरियाणाचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतरही राजीनामा देत नाहीत असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.