पिंपरी-चिंचवड: 'बोलायचं एक आणि करायचं दुसरं, म्हणजेच 'पार्टी विथ डिफरन्स'... आज स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे कार्यक्रम भाजपनं सुरु केले आहेत. डिजिटल इंडिया सोडा, पण संसदेतच वाय-फाय चालत नाही तर देश कसा डिजिटल होईल.' असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्या आज पिंपरीमध्ये बोलत होत्या.


पिंपरी-चिंचवडीमधील एका सभेत बोलताना आज सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी यांना दुसऱ्या कुणाचं ऐकूच येत नाही. त्यांना फक्त स्वत:चंच ऐकू येतं.' असं म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.

'संसदेतच वाय-फाय चालत नाही, तर देश कसा डिजिटल करणार?'

'संसदेत सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल चालीत नाही हे मान्य. पण वाय-फाय देखील चालत नाही? ज्या संसदेत 800 लोकं काम करतात तिथे जर वायफाय चालत नसेल तर देश कसा डिजिटल होईल? बहुतेक त्यांनी जियोला कंत्राट दिलेलं नसेल' अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली.

'मागच्या 20 वर्षात मुंबईत सर्वाधिक बकाल झाली'

'सरकार तुमचेच आहे, मग मुंबई मनपात माफिया राज कसे काय चालू आहे?  एका बाजूला शिवसेनेला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला त्यांनाच घेऊन सरकार चालवायचे. असा दुटप्पी सुरु आहे. मुंबई मागच्या २० वर्षात जेवढी बकाल झाली. तेवढी ती कधीच झाली नव्हती.' असं म्हणत शिवसेना-भाजप मुंबईच्या कारभावरही सुळेंनी टीका केली.

'सरकारचा जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च'

'भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत आल्यापासून कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. हेच पैसे जर मुंबई मनपाच्या शिक्षणावर खर्च केले असते तर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या.' असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला.