अहमदनगर: काही वर्षांपूर्वी आमीर खानच्या थ्री इडियटस् या सिनेमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. शिवाय या सिनेमातून शिक्षणाला कशाप्रकारे हायटेक करता येऊ शकते, याचे दर्शन घडवले होते. याचेच दर्शन अहमदनगरच्या भालगाव जिल्हा परिषदेतील शाळेतील दत्तात्रय शिंदे या शिक्षकाने सर्वांना घडवले आहे. शिंदे यांच्या कल्पकतेमुळे शाळेतील फळ्याची जागा डिजिटल बोर्डने आणि खडूची जागा मार्करने घेतली आहे.


वास्तविक, भालगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला सरकारडून आधीच एक संगणक मिळाला होता. पण गावकऱ्यांनी आत्मियता दाखवत शाळेला आणखी एक 40 इंचचा एलसीडी भेट दिला. हे साहित्य बघून शिंदे सरांचं विचार चक्र फिरलं. अन् अवघ्या शंभर रुपयांची काच लावून त्यांनी या एलसीडीचं डिजिटल बोर्डात रुपांतर केलं. आता वर्गातील खडू आणि फळ्याची जागा एलसीडी स्क्रिन आणि प्रोजेक्टरनं घेतली आहे.

डिजिटल बोर्ड आणि मार्करच्या साहाय्यानं पोरंही शिकण्याचा आनंद लुटत आहेत. बाराखडी गिरवणं, गणित सोडवणं आणि वाचन अगदी अचूकपणानं कुरु लागली आहेत. सध्या आपला भारत डिजिटलच्या माध्यमातून इंडियाकडं वाटचाल करु लागला आहे. ही डिजिटल माध्यमं गावागावात पोहचल्यावर जिल्हा परिषदच्या शाळाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मागं टाकतील हे नक्की.