मुंबई: सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समितीने आंदोलन छेडलं आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी न दिल्याने, पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला होता.


त्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर अशा जिल्ह्यात सुकाणू समितीचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

अहमदनगर: नगरमध्ये ध्वजारोहणाआधीच प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवलेंसह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. तर कोल्हापुरात  शेतकरी संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

बीडमध्ये सुकाणू समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडेंनी ध्वजारोहणाला अनुपस्थिती लावल्याचं बोललं जातं आहे.

पुणे: तिकडे पुण्यात साधू वासवानी चौकात सुकाणू समितीच्या वतीनं बाबा आढाव यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याऐवजी एखादा शेतकरी किंवा शहीद पत्नीच्या हस्ते व्हावा, अशी मागणी केली गेली.

 परभणीत सौम्य लाठीमार

परभणीत शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर झेंडावंदनादरम्यान सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

 राम शिंदे यांची तंबी

सुकाणू समिती आणि शेतकरी संघटना स्टंटबाजी करत आहे, स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव, आहे मात्र जे कोणी कायदा हातात घेईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला.

औरंगाबाद : शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली; पालकमंत्री रामदास कदम यांना रोखण्यासाठी आले होते कार्यकर्ते; औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी