कोल्हापूर : ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. आज रविवारी दुपारी ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती.


आज ऊस दरासंबंधी कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, चंद्रकांतदादा पाटील आणि साखर कारखानदारांमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन पहिल्या उचलीबरोबर 100 रुपये आणि दोन महिन्यांनतर 100 रुपये असे एकूण 200 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या एफआरपी दराला कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही हिरवा कंदील दाखवला आहे.

शेतकरी संघटना ऊसाला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर द्यावा यावर ठाम होती. मात्र, ही मागणी व्यवहार्य नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं होतं. एफआरपीचे पैसे सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, सिस्टीम ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं होतं.

तर रघुनाथ पाटलांनी गुजरातचं उदाहरण देत, भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं होतं.

“गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे राज्य असलेल्या ठिकाणी एफआरपीला चांगला भाव मिळतो. मात्र, महाराष्ट्रात एफआरपी कमी सांगितली जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका,” असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिला होता.

दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूनं काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागं 3400 ते 3500 रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं होतं.