औरंगाबादः ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भुजबळ भेट ही खासगी भेट होती. आरोप लागलेल्या लोकांना भेटायचं नाही, असं असतं तर काँग्रेसच्या अर्ध्या नेत्यांना कोणीच भेटलं नसत, असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. तसेच या भेटीबाबत पंकजा मुंडेच अधिक सांगतील, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.


मराठा समाजाचा मोर्चा म्हणजे आघाडी सरकारविरोधातील आक्रोश

राज्यात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांकडे सरकार सकारात्मक दृष्टीतून बघत असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. गेल्या पंधरा वर्षांपासून ज्या सरकारची सत्ता होती त्यांच्यावरील असंतोष या मोर्चांतून बाहेर निघत आहे.

मराठा समाजाला आमच्या सरकारकडून अपेक्षा आहेत म्हणून मोर्चे काढून मागणी केली जात आहे. याबाबत आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.