Sudhir Mungantiwar : महाराष्ट्र विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी मुनगंटीवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांचं अभिनंदन केलं. '23 नोव्हेंबरला जे अजितदादांनी केलं तेच आता झालंय', असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. 'चांदा चे बांद्याने अडीच वर्षापूर्वी युतीला कौल दिला. पण शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील मतं मागितलेल्यांना धोका दिला', असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.


'कोण, कधी भाजपात येईल सांगता येत नाही'
महाविकास आघाडीतील अर्धे लोक रात्री आम्हाला येऊन भेटतात, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला. त्यांनी म्हटलं की, 'यांच्यातील अर्धे लोक रात्री आम्हाला येऊन भेटतात. कुणाचं नाव सांगण्याची गरज नाही. तिकडंच कोण, कधी इकडे येईल काही अंदाज नाही.'


'यांना एक दिवस सत्तेशिवाय राहता येत नाही'
महाविकास आघाडीला एक दिवस सत्तेशिवाय राहता येत नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, 'यांना एक दिवस सत्तेशिवाय राहता येत नाही. बहुमताने सरकार आलं पण यांनी रडण्याचा कार्यक्रम सुरु केला. हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पण शर्जिलवर कारवाई नाही.'


'बाळासाहेबांचं वचन कुणी मोडलं?'
शिवसेनेनं बाळासाहेबांचं वचन मोडलं असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं. 'ज्यांना फक्त खुर्ची माहित आहे, त्यांना त्याग कधी कळणार? बाळासाहेब म्हणाले होते आयुष्यात कधीही काँग्रेससोबत जाणार नाही. बाळासाहेबांचं वचन कुणी मोडलं, हे माहित आहे.'


इतर महत्वाच्या बातम्या