छत्रपती संभाजीनगर : राजकारणाची पातळी आता कुठपर्यंत पोहचली आहे, याच उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील (Chhatrapati Sambhaji Nagar Siddharth Zoo) बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बछड्यांच्या नामकरणासाठी काढण्यात आलेल्या चिठ्ठीत आदित्य (Aditya) नाव आल्यानं याला मुनगंटीवार यांनी विरोध केला. तसेच आदित्य नाव न ठेवता दुसरं नाव ठेवण्यास सांगितले. त्यामुळे आदित्य नावाऐवजी कान्हा नाव ठेवण्यात आले. 


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिता हिने 7 सप्टेंबर रोजी पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. दरम्यान, आज सिद्धार्थ उद्यानात जन्मलेल्या या बछड्यांचा नामकरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार हस्ते पार पडला. यावेळी लोकांनी पाठवलेल्या नावांची चिठ्ठी टाकून हे नामकरण करण्यात आले. मात्र, याचवेळी मुख्यंमत्री शिंदे यांनी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य हे नाव आलं. परंतु, लगेचच मुनगंटीवार यांनी हे नाव मागे घ्या असे म्हटले. त्यामुळे आदित्य नाव न ठेवता कान्हा नाव ठेवलं गेलं. त्यामुळे बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात देखील राजकारण पाहायला मिळाले. 


राजकीय प्रतिक्रिया...



  • दरम्यान यावर बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, "वाघाच्या बच्छड्याला काय नाव द्यावा हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राजकारण किती खालच्या पातळीवर गेले हे यातून तुम्हाला पाहायला मिळेल. मी राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीवर फार बोलणार नाही. कारण आजचा दिवस चांगला आहे. म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा."


 



  • यावे बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "जंगलामध्ये राहणाऱ्या वाघाच्या बछड्यांना नाव दिलं जात नाही. असे नाव फक्त उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना दिले जातात. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत हे देखील पाहिले पाहिजे."


 



  • तर यावरच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "हे कोणताही आदित्य लपवू शकत नाही. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचं सर्वांना माहीत आहे. त्याचं नाव कोणाला असेल किंवा नसेल त्याचा फरक पडत नाही. आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तर फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहे त्यांनी असाच तिरस्कार करावा आदित्य अजून तळपेल."


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Aurangabad : औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील 'अर्पिता'ने दिला दोन बछड्यांना जन्म; आयुक्तांनी खजूर वाटून केले तोंड गोड