मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी रंगली असताना, दोन्ही पक्षांचे नेते वादाला फोडणी देण्याचं काम करताहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं वक्तव्य अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीन मुनगंटीवारांनी केलं आहे. एकीकडे शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. तर उद्या भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देखील जाहीर करणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.


मुनगंटीवारांनी म्हटलं आहे की, जसे शिवसेनेला पर्याय खुले आहेत तसेच भाजपला देखील पर्याय खुले आहेत. पण 'रघुकुलरीत सदा चली आई' या म्हणीनुसार जर आपण महायुती केली आहे. तर महायुतीच्या सोबतच राहिलं पाहिजे, असे ते म्हणाले. जसे अनेक हात शिवसेनेकडे येत आहेत. तसेच अनेक लोक भाजपला समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रश्न कुणाला किती समर्थन आहे हा नाही तर प्रश्न हा जनतेने महायुतीच्या मागे मत रुपी आशीर्वाद उभा केला. मग जर महायुतीला जनतेचा मतरूपी आशीर्वाद मिळाला असेल तर दुसऱ्यासोबत आच पर्याय खुला आहे, असं म्हणणं ही एक राजकीय मोठी घोडचूक होऊ शकते, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळं शिवसेना  आक्रमक
दुसरीकडे, महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला नव्हता, या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळं शिवसेना अजूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही' या विधानामुळं आजची बैठक रद्द झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.  राऊत म्हणाले, मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असे ते म्हणत असतील तर मला वाटतं आपण सत्याची व्याख्याच बदलायला हवी. कारण, मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे, माध्यमांचे प्रतिनिधीही त्याठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतः फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. उद्धव ठाकरेंनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शाहांच्या समोर हे बोलणं झालं आहे. जर आता ते म्हणत असतील की अशी कोणती चर्चाच झाली नव्हती तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत, असे राऊत म्हणाले.