मुंबई : महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला नव्हता, या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळं शिवसेना अजूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळं आजची बैठक रद्द झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.


फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.  राऊत म्हणाले, मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असे ते म्हणत असतील तर मला वाटतं आपण सत्याची व्याख्याच बदलायला हवी. कारण, मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे, माध्यमांचे प्रतिनिधीही त्याठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतः फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. उद्धव ठाकरेंनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शाहांच्या समोर हे बोलणं झालं आहे. जर आता ते म्हणत असतील की अशी कोणती चर्चाच झाली नव्हती तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत, असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, सामनामध्ये आलेली एक ओळ दाखवावी जी भाजपच्या विरोधात असेल तर मला दाखवावं. सामना या महाराष्ट्राचा मार्गदर्शक आहे. सामना हा सामना आहे तो स्वभाव बदलणार नाही, असेही ते म्हणाले.  शरद पवारांचं कौतुक सर्वात आधी मोदींनी केलंय. आम्ही मोदींचे समर्थक आहोत, त्यात चुकलं काय? मोदींनी कौतुक केलं म्हणून राज्यातले नेते मोदींवर बहिष्कार टाकणार का? पवारांना पद्मविभूषण पुरस्कार कोणी दिला?, असा सवाल देखील राऊतांनी केला.

मी सत्य बोलतोय, परखड बोलतोय. यात काही अपराध असेल तर फासावर लटकवा. मला बाळासाहेब, उद्धव ठाकरे कधी बोलले नाहीत की लिहू नको, असे म्हणत राऊत यांनी 'सामना वाचाल तर वाचाल', असा टोला देखील लगावला.



Shivsena- Bjp | अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतरच महायुतीच्या सत्ता फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब : सूत्र