सोलापूर : वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु, असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते आज सोलापुरात एबीपी माझाशी बोलत होते.


सज्जन विरुद्ध दुर्जन अशी महाभारताची लढाई आहे, यात सज्जनांचा विजय होईल. भाजप मिनी विधानसभेत मुसंडी मारेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे भाजपनं मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे अशा सगळ्या शहरांमध्ये नामचीन गुंडांना पक्षप्रवेश दिला आहे. त्यावरुन शिवसेनेसह सर्वच पक्ष  भाजपवर टीका करत आहेत.

अशा परिस्थितीत सुभाष देशमुख यांनी केलेल्या समर्थनामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे.

भाजपने पक्षात स्थान दिलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते

मयुर शिंदे
मयूर शिंदे हा ठाण्यातील सावरकर नगर परिसरात वास्तव्याला आहे.
भांडूप परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगल, पोलिसांना मारहाणीचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे जवळपास 12 गुन्हे.
2011 साली भांडुप पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई.
तसंच, त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई.

सुधाकर चव्हाण
सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद.
टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल.
खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा.
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव.
नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका.

पवन पवार :
खून, खंडणी, जमीन बळकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या 15 गुन्ह्यांची नोंद.
पोलीस हवालदाराचा खून केल्याप्रकरणात पवन पवार मुख्य आरोपी.
नगरसेवक झाल्यावरही प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी जेलची हवा

पिंटू धावडे :
खंडणी, हत्या आणि मारामारी करुन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद
तुरुंगातच कुख्यात बाबा बोडके यांच्यासोबत धावडेची ओळख झाली
कनिष्ठ न्यायालयाने पिंटू धावडेची निर्दोष मुक्तता केली
2012 साली राष्ट्रवादीने अप्पर इंदिरानगरमधून उमेदवारी दिली, नगरसेवक म्हणून निवड झाली.

श्याम शिंदे :
पोलिसाला मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद
20 जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेर
विधीमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश पार पडला

विठ्ठल शेलार :
2008 पासून विठ्ठल शेलारवर तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद
2010 आणि 2012 मध्ये हत्येचे दोन गुन्हे शेलारवर दाखल
14 फेब्रुवारी 2012 ला दत्तात्रय तिकोणे आणि ज्ञानेश्वर कांबळेचं अपहरण करुन पिरंगुटच्या जंगलात हत्या केल्याचा आरोप
दोघांचेही मृतदेह घोटवडे गावाजवळील दगडखाणी जाळून राख नदीत फेकल्याचा आरोप
अडीच महिन्यांपूर्वी शेलारकडून दोन पिस्तुल जप्त करुन अटक करण्यात आली
2014 मध्ये विठ्ठल शेलारवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.