जनसंघर्ष यात्रेसाठी बाळासाहेब थोरातांच्या कॉलेजमधील विद्यार्थी वेठीला धरल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2018 07:26 PM (IST)
संगमनेरमधील अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मालकीचं आहे. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत गर्दी वाढवण्यासाठी वेठीला धरल्याचा आरोप अभाविपने केलाय.
अहमदनगर : जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआय आणि अभाविप या दोन विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याचं दिसून आलं. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत गर्दी वाढवण्यासाठी शहरातील अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा रद्द करून त्यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी कॉलेज प्रशासनाने वेठीस धरल्याचा आरोप अभाविपने केलाय. या संदर्भात कॉलेज प्रशासनाच्या वतीने हे आरोप धादांत खोटे असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सकाळपासून विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा होती. पेपर रद्द केल्याचे मेसेज खोटे असल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. पण यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संगमनेरात जनसंघर्ष यात्रेत गर्दी दिसावी यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली असून विद्यार्थ्यांनी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेत उपस्थित रहावे, या प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभाविपचे इशान गणपुले यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं निवेदन कॉलेज प्रशासनाला दिलं. ''कॉलेजच्या शिक्षण मंदिरात राजकारण केलं जात असून एनएसयूआयकडून हे राजकारण सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली हे कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना केवळ गर्दी करण्यासाठी वापर करून त्यांच्या भवितव्याशी खेळ केला जातोय,'' असा आरोप अभाविपने केला आहे. कॉलेजने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जनसंघर्ष यात्रेला एकही विद्यार्थी नव्हता आणि कॉलेज प्रशासनाने कोणतीही परीक्षा पुढे ढकलली नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी असे खोटे आरोप केले जात असल्याचं अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी स्पष्ट केलं. बातमीचा व्हिडीओ :