मुंबई : लॉकडाऊनमुळे प्रवास सवलत पासचा लाभ न झाल्याने, ज्याना हे पास रद्द करुन परतावा हवा असल्यास त्या प्रवाशांना परतावा मिळणार आहे. ज्या प्रवाशांना हा परतावा नको असेल त्यांनी घेतलेल्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ देण्यात येणार आहे. परंतु ही मुदत वाढ किती दिवसांची असणार याबाबतची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवास सवलत पास धारक असलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे .


22 मार्च 2020 पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. पण 22 मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक/त्रैमासिक पास काढले होते. मात्र एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणं शक्य झालं नाही. अशा प्रवाशांच्या मासिक/त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करुन, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, तो देखील देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे.


प्रवाशांनी यासाठी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे अर्ज सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. तसंच अशा आशयाचे परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत जारी करण्यात आलं आहे.