धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर देत, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारी कर्मचारी तसंच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नऊ टक्क्यांवरुन बारा टक्के झाला आहे. अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.


राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या पत्रकात नमूद केलं आहे की, "1 जानेवारी 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 9 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात यावा. तसंच महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात यावी."

"1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील  थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील," असं या पत्रकात नमूद करण्यात आलं.