राज्य सरकार दीड हजार कोटींची तूर खरेदी करणार
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2017 03:05 PM (IST)
मुंबई : राज्य सरकारनं तब्बल दीड हजार कोटी रुपयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार साधारणपणे 25 लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. राज्यातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी तूरखरेदी मानली जात आहे. किमान 5 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल या दरानं ही खरेदी केली जाणार आहे. राज्यभरात यासाठी 286 ठिकाणी तूरखरेदी केंद्रंही उभारली जाणार आहेत. यंदा राज्यात तूर उत्पादन तिपटीनं वाढलं असलं, तरी म्हणावा तसा दर न मिळाल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातला सर्वात मोठं तूर निर्मिती करणारं राज्य आहे. देशातील अर्धी तूरनिर्मिती महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत मिळून होते. 11.7 लाख टनापैकी 2.3 लाख टन तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे.