पुणे : दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यावर सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत ते विद्यार्थ्यांना मिळणारे शंभर टक्के मार्क्स. शाळांच्या अंतर्गत मूल्यमापनामुळे गुणांना, पर्यायाने निकालाला आलेला हा फुगवटा घालवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर पुनर्विचार करत असल्याची चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांच्या स्पर्धेपुढे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या म्हणजे एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टिकाव लागत नाही, या विचारातून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे दोन भाग करण्यात आले होते. ज्यात अंतर्गत आणि बहिस्थ मूल्यमापनाचा समावेश करण्यात आला. 2007 या वर्षापासून हा निर्णय अंमलात आणायला सुरुवात झाली. मूल्यमापनाची विभागणी कशी? - प्रत्येक विषयाला 20 याप्रमाणे सहा विषयांचे 120 गुण - बहिस्थसाठी म्हणजेच लेखी परीक्षेसाठी प्रत्येक विषयाला 80 गुण मराठी 80 हिंदी किंवा संस्कृत 80 इंग्रजी 80 विज्ञान 80 बीजगणित-भूमिती 40-40 इतिहास-नागरिकशास्त्र 28 + 12 = 40 भूगोल-अर्थशास्त्र 28 + 12 = 40 अंतर्गत आणि बहिस्थ मूल्यमापन पद्धतीचा फेरविचार केला जात आहे. मूल्यमापनासाठी पर्याय काय असू शकतात यावर चर्चा सुरु आहेत आणि येत्या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन निर्णय लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्या लागलेल्या दहावीच्या निकालात तब्बल पंचेचाळीस हजार मुलांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. त्यात महत्त्वाचा वाटा अंतर्गत मूल्यमापनाचा आहे. आता सरकार याबाबतीत काय निर्णय घेतं, हे महत्त्वाचं आहे.