धुळे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलत योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी (1 मे 2018) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सवलत कार्ड देऊन होणार आहे.


वीरपत्नींना देण्यात येणाऱ्या कार्डवर एका बाजूला शहीद झालेल्या जवानाचा फोटो, नाव, हुद्दा, पत्ता आहे, दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक, नाव, पत्ता, रक्तगटाचा उल्लेख असेल.

राज्यातील 517 वीरपत्नींना उद्या हे सवलत कार्ड देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपस्थित राहता यावं यासाठी एसटी प्रशासनाने विशेष सोय देखील केली असल्याचं एसटीच्या सूत्रांनी सांगितलं.

एसटी प्रशासनाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे काही वीरपत्नींनी ही सवलत योजना स्वतःची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन स्वतःहून नाकारली आहे.

शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळ या शहीद सन्मान योजनेची सुरुवात करुन थांबलं नाही, तर यापुढे शहीद जवानाच्या पाल्याला अथवा वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट एसटीच्या नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

शहीद जवानाच्या पाल्याला अथवा वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट एसटीच्या नोकरीत सामावून घेणारं एसटी महामंडळ हे देशातील एकमेव महामंडळ आहे. एसटीचा हा आदर्श इतर महामंडळांनी देखील अंमलात आणून शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करावा असा सूर आता सर्व स्थरातून उमटत आहे.

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीने प्रत्येक प्रवाशाने प्रवास केल्यास एसटीच्या या योजनांसाठी आपली देखील खारीच्या वाट्याची मदतच होईल. ही सुद्धा एक देशसेवाच आहे. ही भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात निर्माण होऊन खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीने प्रवास केल्यास आपण दिलेल्या पैशाचा योग्य विनीयोग झाला. याचं आत्मिक समाधान प्रत्येक प्रवाशाला  होईल, असा विश्वास एसटीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.