नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे. ईटीएच कंपनीही आता पोलिस भरती घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.


विशेष म्हणजे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे ईटीएच कंपनीचे संस्थापक आहेत. मात्र तीन वर्षांपूर्वीच आपले या कंपनीशी संबंध संपले असल्याचे डॉ. भटकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगतिले होते.

नांदेड पोलिस भरती उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे एसएसजी कंपनीला मिळाले होते. एसएसजी कंपनी ही मागील 4 वर्षांपासून नांदेड पोलिस भरती उत्तरपत्रिका तपासणीचे काम करते. या कंपनीची ईटीएच ही पॅरेंटल कंपनी आहे. त्यामुळे आता ईटीएच या कंपांनीचीही नांदेड पोलिस चौकशी करणार आहेत.

नांदेड मध्ये पोलिस भरतीतील गैरव्यवहार उघडकीस आला. या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह 5 आरोपी अद्यापही फरार आहेत. या सर्व फरार आरोपींना अटक करण्यासाठी आता पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

विशेष म्हणजे पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात नांदेड पोलिस अधीक्षकांचे अभिनंदन केले आहे. नांदेड पोलिसांनी या घोटाळ्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे पाठवला आहे. वरवर छोटा वाटणार्‍या या घोटल्याची व्याप्ती आता वात असून या सर्व आरोपींनी एकूण 17 जिल्ह्यात असेच प्रकार केल्याचे आता तपासात समोर येत आहे.