ST Workers Strike LIVE Updates Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने संप सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले.


एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात राज्य कार्यकारणीची आज बैठक 


एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात राज्य कार्यकारणीची आज बैठक बोलावली आहे.  मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांची तातडीची बैठक आहे. आज 11 वाजता पुण्यातील खराडी येथे बैठक होणार आहे. एका बाजूला राज्य कार्यकारणीची बैठक तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात सर्व डेपो बंद करण्याचे आदेश कृती समितीने दिले आहेत. दोन संघटनांच्या वेगवेगळ्या आदेशामुळे एसटी क्रमचारी संभ्रमावस्तेत आहेत. पुढची दिशा ठरवताना कृतीसमितीला सोबत घ्यायचे की नाही यावरही आजच्या बैठकीत   निर्णय होणार आहे. 


उस्मानाबादेत बससेवा बंद


उस्मानाबादेत पहाटेपासून एकही बस डेपोबाहेर गेली नसल्याने दिवाळी संपवून परतीच्या प्रवासाला जाणार्‍या प्रवाशांची अडचण होत आहे. आगारातील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.


नागपूर जिल्ह्यात बससेवा बंद 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे नागपूरच्या गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्व आगारात एसटी बसेसचा परिचालन हळूहळू थांबत आहे. एकट्या गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून रोज 926 बस फेऱ्या व्हायच्या. सुमारे 40 हजार प्रवासी रोज गणेश पेठ बसस्थानकावरून प्रवास करायचे. मात्र आता एसटीची चाकं थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे काल मध्यरात्रीपर्यंत गणेश पेठ बस आगारातून बस फेऱ्या नियमित सुरू होत्या... मात्र आज सकाळपासून सर्व चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे...


एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार 
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार झालंय. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती 3 महिन्यांत न्यायालयाला अहवाल देणार असल्याचं कळतंय.