जळगाव : जळगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आणि मुंबई होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी  मनोज लोहार आणि धीरज  येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले होते.


मनोज लोहार आणि धीरज येवले या दोघांवर 2009 मध्ये चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात 16 जानेवारी रोजी मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाचे दोषी ठरवले होते.  भादंवि कलम 364 (अ) अन्वये दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव  महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना 30 जून 2009 रोजी चाळीसगाव येथे घडली होती.  मनोज लोहार यांची जळगाव जिल्ह्यातील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. याप्रकरणी बुधवारी कोर्टाने निकाल दिला. त्यात मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले.