वाशिम: अखेर वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील जवान सुनील धोपे यांचं पार्थिव स्वीकारण्यास कुटुंब तयार झालं आहे. जिल्हा प्रशासन आणि धोपे कुटुंबातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. त्यामुळे उद्या कारंजा येथे सकाळी 10 वाजता अमरावती येथून पार्थिव आणलं जाईल. त्यानंतर संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढून, जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.


यावेळी जिल्हा प्रशासनानी धोपे कुटुंबांना लेखी पत्र दिले. त्यानुसार सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. धोपे कुटुंबाच्या मागणीची प्रत सरकारकडे सुपूर्द केली जाईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कारंजा येथील रहिवासी सुनील विठ्ठलराव धोपे हे मेघालयतील शिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत  होते. 15 सप्टेंबर रोजी ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. मात्र सुनील धोपे यांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर घातपात आहे, असा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला होता. तसंच त्यांना शहिदाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. 

धोपे यांच्या मृत्यूची माहिती 15 सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून धोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी 16 सप्टेंबर रोजी अमरावतीतील कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देत चौकशीची मागणी केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते.

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले होते. अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती पोलिसांनी  दिली होती. परंतु जोपर्यंत धोपे यांना शहिदाचा दर्जा मिळणार नाही, तसेच त्यांच्या घातपात करणाऱ्यांना कठोर शासन होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, अशी धोपे कुटुंबीयांनी भूमिका घेतल्याने त्यांचे शव अमरावती येथे नेण्यात आले.

सुनील धोपे हे 19 वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले वआणि भाऊ असा परिवार आहे.

सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला. सुनील धोपे यांनी 14 सप्टेंबर रोजी फोन करुन आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकाऱ्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर धोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला 16 सप्टेंबर रोजी तक्रार देत सविस्तर चौकशीची मागणी केली.