मुंबई : राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. या मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व‍िकासाला चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाव‍िकांची मोठी सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.


या महत्त्वपूर्ण न‍िर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण‍ि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे व‍िशेष आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19 च्या न‍ियोजनात नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे.


सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्‍या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षी जिल्ह्यासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या व‍िकासाला चालना मिळणार आहे.


तसेच, महाराष्ट्राची कुलस्वाम‍िनी असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.