Solapur News : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तीन माजी आमदारांनी पक्षाला रामराम करत उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्य सुपुत्र रणजीत शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून दे धक्का मिळाला आहे. मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. 

Continues below advertisement


मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या  भाजपमध्ये जाणार


मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपने मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला राजकीय धक्का दिलाय. उद्या मुंबई येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.   आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महायुतीतील मित्र पक्षांना आणखी एक धक्का दिला आहे. 


भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात उद्या सकाळी 10 वाजता 'या' नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश 


भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात उद्या सकाळी (29 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) त्यांचे दोन्ही पुत्र विक्रांत व अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांच्यासह 28 जणांचा समावेश असणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. मोहोळमधील शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर या पिता-पुत्रांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांची आपापल्या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळं त्यांच्या जाण्याचा मोठा तोटा राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दिग्गज नेते भाजपमध्ये आल्यानं भाजपला सोलापूर जिल्ह्यात मोठा फायदा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे पक्ष प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत.