Solapur: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. पावसाळी कांदा मातीमोल दरानं विकला जाऊ लागलाय. लाखो रुपये खर्च करून आणि दिवसरात्र मेहनत करूनही शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल दरानं विकावा लागतोय. ज्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. यातच सोलापूरमध्ये अकरा क्विंटल कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेला फक्त 13 रुपये आल्याची माहिती समोर आलीय. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे नेते लोकसभेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाष्य केलंय. 


"या 13 रूपयामधून सरकारचे 13 वा घालावे का? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकऱ्यानं 24 पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापाऱ्याला विकले. जवळपास 1 हजार 123 किलो कांदे विकून या माझ्या बळीराजाला 1 हजार 665 रूपये मिळाले. हमाली, तोलाई, मोटार भाडे वजा जाता 13 रूपये बापू कावडे या शेतकऱ्यास शिल्लक राहिले" असं राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. 


राजू शेट्टी यांचं ट्विट- 



अवकाळी पावसामुळे सोलापुराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय. सोलापूरच्या बाजारात दोन दिवसांपूर्वी 220 गाडी कांद्याची आवक होती. शुक्रवारी देखील आवक 150 गाडी इतकी होती. मात्र, आज आवक निम्म्याहून अधिक घटून केवळ 55 गाडी इतकी आहे. अवकाळी पावसामुळं कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. पावसात भिजल्यानं साधारण कांद्याला केवळ 100 ते 300 रुपये इतका दर मिळतोय. तर, साठवणूक करून ठेवलेला जुना उत्तम दर्जाच्या कांद्याला 1 ते 2 हजार रुपये दर मिळाला. 


घसरलेल्या दरामुळं अनेक शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील कांदा विक्रीतून निघत नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी बाजारात आपला कांदा अक्षरशः फेकून दिलाय. मोफत दिला तरी कोणताही व्यापारी हा कांदा घेऊन जायला तयार नाही अशी परिस्थिती अवकाळी पावसामुळं निर्माण झालीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA


हे देखील वाचा-