मुंबई : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसचा हात धरला आहे. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख उपस्थित होते. सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तसा न्याय मिळाला नव्हता. यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते.


यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना गळाला लावलं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपासाठी ही जागा कशीतरी टोकावर निवडून आणता आली होती. मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना पक्षात दुर्लक्षित केल्याच लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. शिवाय मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्येही मदत झाली होती. मोहिते विरुद्ध मोहिते ही लढाई त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पिढीतही अखंडपणे सुरु ठेवली होती. विजयसिंह मोहिते पाटील गटाला विरोध करण्याचं काम ते करत होते. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते. परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.


ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पराभवाला घाबरत नाही. काँग्रेस संपली संपली म्हणतात. वाईट दिवस येतात. पण त्याच पक्षात काम करून पक्ष उभं करण्याचे काम लोक करतात. काँग्रेस विचाराला मानणारी तरुण पिढी आहे, असं ते म्हणाले.


Cannibal Leopard | डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या तोंडून नरभक्षक बिबट्याला ठार केल्याचा थरार


धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, मी कृषिमंत्री असताना पहिल्यांदा धवलसिंह मोहिते पाटील यांना भेटलो. त्यांनी बिबट्या मारला हे आज कळलं. जर कोणी चुकीचं वागलं त्याचा कार्यक्रम ते करतात. त्यांच्याकडं धाडस आणि विनम्रता आहे. साखर कारखाने संस्था हे काँग्रेस विचाराने झालं. मध्ये काही गोष्टी झाल्या इकडे तिकडे गेले पण पुन्हा स्वगृही आले आहेत, असं ते म्हणाले. थोरात म्हणाले की, काँग्रेस संपली असं म्हटलं जात असताना ती उभी राहिली आहे. काँग्रेसचा विचार राज्यघटनेचं मूलभूत तत्वाशी आहे. हीच घटना देशाला पुढे नेणार. तो श्वाश्वत विचार आहे. पुन्हा काँग्रेस नेतृत्व उभं राहिलेलं दिसलं. नवीन फळी निर्माण करणं महत्वाचं आहे. जो लौकिक आदर मिळाला तो देशात राज्यात मिळाला तो पक्षाने दिला. तुम्ही काम करत राहा पुढे आमदारकी की खासदारकी संधी पक्ष देईल, असं थोरात म्हणाले. पहिले टार्गेट जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसचा झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.


बिबट्यावर वेळीच गोळी झाडली नसती तर आज तुमच्यासमोर नसतो : डॉ. धवलसिंह मोहिते पाटील


आमदार धीरज देशमुख म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवून धवलसिंह यांनी प्रवेश केला आहे. काँग्रेसचा पडता काळ आहे का अशी चर्चा होते. आज साहेबांचे शब्द आठवतात ते म्हणायचे काँग्रेस हा विचार आहे तो कोणीही संपवू शकत नाही. गेले अनेक वर्षे या कुटुंबाशी आमचे संबंध होते. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस विचार केला तेव्हा त्यांनी भविष्य कुठे आहे हे ओळखून काँग्रेस हात धरला. आज हाताच्या माध्यमातून ताकद वाढेल. धवलसिंह नरभक्षक बिबट्याला समोर जाणारे आहेत. त्यांनी बिबट्याला टिपलं आता भाजपला टिपतील, असं ते म्हणाले.


काँग्रेसची काम करण्याची पद्धत सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. ही विचारधारा आपल्या तत्वाशी बांधिल आहे. चांगले वाईट दिवस येत असतात. मुळाजवळ गेल्याशिवाय वाढ होत नाही, म्हणून मी मुळापाशी आलो आहे, असं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले. माझ्यावर प्रेम करणारी जनता ही माझी संपत्ती आहे, असं ते म्हणाले.