अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.


साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत, अर्चना टकले, आशिष हिवरकर, अबरार अहेमद रोशन अहमेद अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. विषप्राशन केल्यानंतर या शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी, शेळद आणि व्याळा गावातील आहेत. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या स्तारीकरणात या सर्वांची शेती गेली आहे.


मात्र, या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचा सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं आहे. त्यामूुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या कक्षात विष प्राशन केलं.  उद्या अकोल्यात मुख्यमंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.