मुंबई : राज्यभरात होळीनंतर धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, आज काही जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने होळी सणाला गालबोट लागलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोलीतही मित्राकडे रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील अस्वाली धरणात एक तरुण बुडल्याची माहिती आहे. तर, अमरावतीत एका वीस वर्षीय युवतीचा तलावात मृतदेह आढळला आहे. दरम्यान, पुण्यात रंग खेळण्यावरुन वाद झाल्याने दोन गटांत राडा झाला.


चंद्रपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू
होळीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात तीन जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झालाय. पहिल्या घटनेत गोंडपीपरी तालुक्यात मुरुमाच्या खड्ड्यात बुडून 11 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला. नांदगाव फुर्डी गावातील संस्कार मोगरे रंग खेळल्यावर आंघोळीसाठी आपल्या मित्रांसह गावाशेजारील खड्ड्यावर गेला होता. मात्र, खड्डा खोल असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत वरोरा शहरातील युवक वर्धा नदीत बुडाला. अंकित पिंपळशेंडे हा सरदार पटेल वॉर्डातील युवक 4-5 मित्रांसह मारडा येथे वर्धा नदीवर रंगपंचमी साजरी करण्यासाठी व आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान आंघोळीकरिता नदी पात्रात सर्व उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अंकित बुडाला. नातेवाईक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंकितचा शोध सुरू आहे. तर, तिसऱ्या घटनेत रंगोत्सवाचा गुलाल उधळून नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू, अखिल कामीडवार(वय 27)असे मृतकाचे नाव. पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील रहिवासी असलेला हा युवक आज धुळवड साजरी करुन काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. होळीच्या दिवशी जिल्ह्यात दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या सणाला गाटबोल लागले आहे.

वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक! नाशिकमध्ये धुलिवंदनाची तीनशे वर्षांपासूनची अनोखी परंपरा

हिंगोलीत दोन तरुणांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू
मित्राकडे रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली मधील वसमत तालुक्यातील ही घटना घडली. वसमत तालुक्यातील पार्डी येथे नांदेडहुन आपल्या मित्रांकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आले होते. अनिल बबनराव खरे आणि अवधूत आबगोड कोयलवाल अशी मृत तरुणांची नावे आहेत. अनिल हा सिडको भागातील खोब्रागडे नगर, तर अवधूत हा पोर्णिमा नगरात राहतोय. हे दोघेजण आपल्या मित्रांसमवेत पार्डी बागल येथील एका मित्राकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आले होते. रंगपंचमी साजरी केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतामध्ये शेततळे दिसले त्यामध्ये त्यांनी पोहण्याचा निश्चय केला. त्यांना त्यांच्या काही मित्रांनी पोहण्यासाठी नकार दिला. मात्र, ते कुणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नव्हते. अवधूत आणि अनिलने थेट कपडे काढून त्या तलावांमध्ये उडी घेतली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झालाय. शेतात तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाला मात्र चांगलीच कसरत करावी लागली. उशिरानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेचा पंचनामा करून वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविले. याप्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, ऐन रंगपंचमीच्या दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

पालघरमध्ये एकाचा मृत्यू
डहाणू जवळील अस्वाली धरणात एक तरुण बुडल्याची माहिती मिळाली आहे. स्वान आर्यन (वय 29)असं बुडालेल्या तरुणाचं नाव असून तो डहाणूतील मसोली येथील राहणारा आहे. आज धुळवड खेळून झाल्यानंतर आपल्या तिघा मित्रांसह धरणावर अंघोळीसाठी गेला असताना बुडल्याची माहिती पोलीसांनी दिली.
बीडच्या विडा गावातील अनोखी प्रथा, धुलिवंदनाला जावयाची गाढवावरुन मिरवणूक

पुण्यात दोन गटात हाणामारी
पुण्यात धुलीवंदनात रंग खेळताना दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यवसन पुढे हाणामारीत झाले. यात गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

भिवंडी धुलीवंदन खेळताना वाद
भिवंडी शहरातील संगमित्रनगर परिसरात धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुलं धुलीवंदन खेळत असताना पाण्यावरून वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद मुलांच्या दोन गटातील हाणामारी बदलला. मात्र, दोन गटांच्या भांडणाला सोडवण्यासाठी काही स्थानिक महिला गेल्या असता त्यांनादेखील त्या ठिकाणी मारहाण झालीये. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लाठीचार्ज करत भांडण करणाऱ्या टोळक्यांना पळवून लावलं आहे, सध्या शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Bhiwandi Holi Celebration | कोळी बांधवांची पारंपारिक होळी, कोळी बांधवाच्या होळीला 85 वर्षांची परंपरा