लातूर : शेतकरी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी दोन हात करीत असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथे शॉर्टसर्किटमुळे जनावरांचा गोठा जळून लाखो रुपयांचा कडबाही जळून खाक झाला आहे.


सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बाकली येथील अभंग शिंदे, भानुदास शिंदे आणि गुणवंत शेळके हे शेतवस्तीवर राहण्यास आहेत. घराजवळून विद्युत तारा गेल्या असून गुरुवारी दुपारी 2 च्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली.

यामध्ये दीड हजार कडबा, शेती अवजारे, धान्य आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी आणि मंडळ अधिकारी हे पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या नुकसानीमुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली असून मदतीची मागणी या तिन्हीही शेतकऱ्यांनी केली आहे.