रायगड : निवडणूक आयोगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या सभांचे खर्च मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी आयोगाची पाठराखण केली आहे. निवडणूक आयोग प्रत्येक राजकीय पक्षाला विचारू शकतो. खर्च मागवणे याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी सभा केली असा होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


तटकरे म्हणाले की, या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेईल, या प्रकरणी मनसे देखील आपली भूमिका मांडेल. निवडणूक आयोगाने थेट पंतप्रधानांना मोदींना नोटीस काढली, राहुल गांधींना नोटीस काढली. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रचारासाठी बंदी केली. त्यामुळे निवडणूक आगोग कुठल्याही पक्षाला खर्च मागू शकतो, असे ते म्हणाले.

राज यांच्या सभांमधून केलेली मांडणीने लोकांच्या मनात कुतुहल निर्माण केलंय. त्यांच्या दहा सभांनी ग्लॅमर तयार केलं आहे, असेही तटकरे म्हणाले.

2014 मध्ये नामसाधर्म्यामुळे माझा पराभव झाला होता. मात्र यावेळी दहा उमेदवार जरी नामसाधर्म्याचे उभे केले असते तरी फरक पडणार नसल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

2014 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सुनील तटकरे यांचा अवघ्या 2100 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील तटकरे या दुसऱ्या उमेदवाराने जवळपास 9 हजार 849 मते घेतली होती.

या मतांचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता. यावेळी सुद्धा त्यांच्याविरोधात 2 सुनील तटकरे रिंगणात आहेत. याबाबत तटकरे यांना विचारलं असता गेल्या वेळी नाव साधर्म्य उमेदवारामुळेच आपला पराभव झाला.  यावेळी मात्र आम्ही खबरदारी घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.