शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी, सर्व राजघराण्यांना निमंत्रण
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 06:23 PM (IST)
मुंबई : अरबी समुद्रात शिवस्मारक तयार करण्यासाठी 16 ठिकाणाहून पाणी आणि माती आणण्यात येणार आहे. शिवाय छत्रपती आणि सरदार घराण्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे. इतिहासकार, गड आणि किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना, शिवस्मारक चळवळीशी जोडलेल्या संघटनांना आणि सर्व जाती धर्मातील शिवप्रेमींना कार्यक्रमासाठी बोलावण्यात येईल, असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. शिवस्मारक व्हावं यासाठी 1987 पासून आंदोलन केलं. 1995 ला युती सरकार आलं तेव्हा समिती झाली, त्यानंतर आता 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. मोठा काळ लोटला, पण अखेरीस कामाला सुरूवात होत आहे, असंही विनायक मेटे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमीपुजन केलं जाणार आहे. प्रसिद्ध मुर्तीकार राम सुतार शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणार असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली. महाराष्ट्रात 16 ठिकाणाहून माती आणि पाणी येणार - शिवनेरी - रायगड - पन्हाळा - शिखर शिंगणापूर - तुळजापूर - सिंदखेड राजा - कराड - जेजुरी - राजगड -प्रतापगड -देहू आळंदी -रामटेक - वेरूळ - प्रकाशा - नाशिक