मुंबई : शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'सत्यमेव जयते' आणि 'प्राण जाये पर वचन ना जाय' हे संतवचन पाळले असते तर भाजपवर विरोधी पक्षात बसून मळमळ ओकण्याची वेळ आली नसती, अशी टीका 'सामना'मधून करण्यात आली आहे.


विरोधकांनी सत्ताधाऱ्यांशी शत्रू असल्याप्रमाणे आकसाने वागू नये असा सल्लाही अग्रलेखाद्वारे शिवसनेकडून देण्यात आला आहे. एकीकडे संतवचनांचा गजर करायचा आणि वर्तणूक मात्र मंबाजीसारखी करायची, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही 'सामना'ने धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मन साफ असून आगामी काळात ते सरकारचे नवे मित्र बनतील, असा विश्वासही शिवसेनेने व्यक्त केला आहे.


'सामना'ने काय म्हटलंयय़
'सत्यमेव जयते' व 'प्राण जाय पर वचन न जाय' हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही.


105 आमदार निवडून येऊनही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते व त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करीत आहेत. मळमळच ती, त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे व तंगड्या झाडणे नव्हे. विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात, पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे व विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये. सभागृहात संतांची वचने वगैरे ऐकवून सरकारवर टीका करण्याची भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपुरात पार पाडली, पण 'सत्यमेव जयते' व 'प्राण जाय पर वचन न जाय' हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.