मुंबई : मागील काही दिवस चर्चेत असलेल्या अॅट्रोसिटी कायद्याच्या वादावर आज शिवसेनेनेही मुखपत्र 'सामना'तून टीका केली आहे. अॅट्रॉसिटीचा मुद्दा उकरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या जातीय राजकारणाची ठिणगी टाकल्याचा हल्लाबोल 'सामना'त करण्यात आला आहे.


 

बलात्कार पीडित आणि आरोपीला कोणतीही जात अथवा धर्म नसतो. कायद्यानुसार त्यांना शिक्षाही दिली जाते. तरीही शरद पवारांनी अॅट्रोसिटी कायद्यावर मतप्रदर्शन करुन राज्यात अप्रत्यक्षपणे जातीय वादाची ठिणगी टाकल्याची टीका 'सामना'मधून करण्यात आली आहे.

 

कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाला एकत्र आणण्याची भाषा करुन काही मंडळी राज्यातील एकोपा भंग करत असल्याचंही 'सामना'मध्ये म्हटलं आहे.

 

अॅट्रोसिटी हा कायदा सुरक्षाकवच न राहता गैरवापराचं हत्यार बनत असेल तर विधानसभेचं अधिवेशन बोलवून त्यावर चर्चा व्हावी. पण यातून राज्यात पुन्हा जातीयतेचा ताप वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असं म्हणत, शिवसेनेने शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.