जालना : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मध्ये छापून आलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.


शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन 'सामना'चा निषेध व्यक्त केला आहे.

‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.  नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली


दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे


श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे


मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.