औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या औरंगाबादच्या पोलीस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला आहे.


सध्याचे शिवसेनेचे आणि त्यावेळचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 5000 रुपयांचा, म्हणजेच दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.

काय आहे प्रकरण?

5 जानेवारी 2011 रोजी पोलीस आणि तत्कालीन मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात राडा झाला होता. त्यावेळी पोलीसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला होता.

अजंठा वेरुळच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी तत्कालीन मनसे आमदार हर्षवर्धन जाधव प्रयत्नशील होते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जाधव हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

वेरुळकडे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात त्यांनी आपली गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. ही गाडी अडवणाऱ्या कॉन्स्टेबलच्या अंगावरही गाडी घातल्याचा दावा पोलिसांचा होता. त्यानंतर काही अंतरावर पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आमदार हर्षवर्धन जाधवांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आमदारांनी कोकणेंच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बंदोबस्ताला असणाऱ्या दोन महिला कॉन्स्टेबल्सनाही मारहाण केली.

त्यामुळे संतापलेल्या 50 ते 60 पोलिसांनी हर्षवर्धन यांना बेदम चोप दिला. इतकेच नाही तर त्यांना रत्नपूर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केली होती. आमदारांना पोलिसांनी लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी मारलं होतं. पोलिसांच्या मारहाणीत हर्षवर्धन जाधव गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या सर्व प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले होते. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं.

www.abpmajha.in
संबंधित बातम्या

मारकुट्या पोलिसांचं निलंबन निश्चित